Monday 18 April 2022

 ✍️ *श्रीपाल सबनीस ह्यांचे सत्तेचा नव्हे सत्याचा भोंगा वाजवावा विधान‌ ठिक आहे, पण बुध्द - आंबेडकरी साहित्य...?*

   *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

मो. न.‌ ९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२


    "सत्ताकारण आणि धर्मकारण हे लोकांना आणि समाजाला तोडित असते. या उलट साहित्यिकाचे काम समाजाला जोडणे हे आहे.‌ आमचा भोंगा सत्तेचा नसुन सत्याचा आहे. दलित साहित्य वगैरे अन्य वेगळेपण ठेवण्याची गरज नाही. ‌कोणत्याही एका व्यक्तीमुळे किंवा विचारधारेमुळे समाजाचा विकास होणार नाही, हे लक्षात ठेवायला हवे. साहित्यात आता केवळ ईहवादी हिच समिक्षा झाली पाहिजे." असे स्पष्ट विचार नामांकित ईहवादी मराठी साहित्यिक आणि भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष  *श्रीपाल सबनीस* यांनी नागपुरात नुकतेच आयोजित *"पहिल्या राज्यस्तरीय माय मराठी साहित्य सम्मेलन"* ह्याचे उदघाटन प्रसंगी ते समेलनाध्यक्ष म्हणुन बोलुन गेले.‌ सबनीसांचे सदर काही विचार मला एक अभ्यासक म्हणुन खटकले. आणि त्याची मला कारणे ही सांगता येतील.

    पहिला मुद्दा - *"सत्ताकारण आणि धर्मकारण "* या विषयावर आपण बोलु या. सत्ताकारण / धर्मकारण कोणते ? देववाद / धर्मांधवाद  ह्या संदर्भात आपली भुमिका काय आहे ? त्याचा पाया कुणी रोवला ? त्यावर कृती प्रतिबंध आणण्यास मराठी / ईहवादी साहित्यिक ह्यांची काय बांधिलकी असणार आहे ? सदर वास्तव बांधिलकी जोपासायची झाल्यास आपण कोणती योजना राबविणार आहात ? विद्येची देवता (?) सरस्वती हे आपण नाकारणार काय ? सरस्वती हिचे साहित्यात प्रत्यक्ष योगदान काय ? असे असंख्य प्रश्न हे उभे असणार आहेत. डाॅ. श्रीपाल सबनीस सदर प्रश्नांंचा उहापोह हे सोडविणार आहात काय ? हा प्रमुख प्रश्न‌ आहे.

    दुसरा मुद्दा - *"साहित्यिकाचे काम हे समाजाला जोडणे"* यावर चर्चा करु या. कोण कोणत्या साहित्यिकांनी समाजाला एकत्र जोडलेले आहे ? भारतीय समाज हा एकसंघ समाज केलेला आहे ? सदर समाज एकीकरण योजना आपण सादर करु शकता काय ? केवळ सत्तेचा नव्हे सत्याचा भोंगा हा केवळ भोंगाच ठरेल ? कृतीशील भाव नाही. रुढीवादी मराठी साहित्य नाकारून अन्य साहित्य निर्मितीची कारणे काय ? मराठी / ईहवादी साहित्याचा खरा मदारी हा कोण असणार आहे ? अशी असंख्य प्रश्न आहेत. ह्याची उत्तरे ही डॉ. श्रीपाल सबनीस देणार आहात काय ? की सम्मेलनाध्यक्ष पदावरुन केवळ वटवट भोंगा हा वाजलेला आहे ?

    तिसरा मुद्दा - *"दलित साहित्य वगैरे वेगळेपणा आणि एक विचारधारा !"* ह्या महत्वपुर्ण विषयावर आता बोलु या.‌ आम्ही *"दलित साहित्य / दलितत्व"* हे तर पुर्णत: नाकारलेले आहे. सरस्वती पुरस्कार प्राप्ती *शरणकुमार लिंबाळे 'दलित'* / ईहवादी साहित्यिक *प्रा.‌ यशवंत मनोहर* / गांधीवाद पुरस्कर्ते *प्रा.‌ रावसाहेब कसबे* / बिनवादी *लोकनाथ यशवंत* वगैरे अपवाद साहित्यिक सोडले तर ! अन्य साहित्य संदर्भात खोलवर न जाता केवळ आणि केवळ *"बुध्द आणि आंबेडकरी साहित्य"* यावर चर्चा करु या. आपण आद्य साहित्यिक म्हणुन *भदंत अश्वघोष* यांना स्विकारणार आहात काय ? *कालिदास* यांना द्वितिय श्रेणीमध्ये घेणार आहात काय ? *रामायण / महाभारत* ह्याला साहित्याच्या कुठल्या वर्गात आपण घेणार आहात ? *बुध्द / राष्ट्रपिता ज्योतिबा फुले / डाॅ. बाबासाहेब आंबेडकर* या एका व्यक्तीमुळे / विचारधारेतुन झालेली महान‌ क्रांती आपण नाकारत आहात काय ? मग एका व्यक्तीमुळे / विचारधारेतुन समाजाचा विकास होणार नाही‌ ? हे वाक्य कोणत्या आधारावर आपण कथन केले आहे ? अशी असंख्य प्रश्नांची उत्तरे डाॅ. श्रीपाल सबनीस हे देणार काय ? हा प्रश्न आहे.

    चवथा मुद्दा - *"साहित्याची ईहवादी समिक्षा व्हावी"* ह्या विषयावर चर्चा करु या. तसा हा विवादाचा विषय म्हणायला हरकत नाही. *बुध्द / ज्योतिबा फुले / डाॅ. बाबासाहेब आंबेडकर* यांचा नीतिवाद / नैतिकवाद / मानवतावाद / स्वातंत्रवाद / समतावाद / बंधुतावाद / न्यायवाद / प्रज्ञावाद / शीलवाद / करुणावाद ह्या संदर्भात आपली भुमिका काय आहे ? बुध्द सौंदर्यशास्त्र / बुध्द दर्शनशास्त्र / फुलेंचा व्याकरणवाद / आंबेडकर सौंदर्यशास्त्र / आंबेडकर दर्शनशास्त्र इत्यादी संदर्भात आपली स्पष्ट भुमिका काय आहे ? आपला ईहवाद यापेक्षा मोठा आहे काय ? अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरे श्रीपाल सबनीस यांच्याकडुन अपेक्षीत आहेत. साहित्याची समिक्षा करतांना सदर वाद हा नाकारावा वा कसे ?

    पाचवा मुद्दा - *आमचा भोंगा सत्तेचा नसुन सत्याचा आहे"* ह्या शेवटच्या मुद्यावर बोलु या.‌ तसे मुद्दे हे असंख्य आहेत.‌ विचार लेखनाची मर्यादा जोपासणे ही गरजेचे आहे. सदर विचारात कृतीशील भाव हा कोणत्या प्रमाणात आहे ?   किती प्रमाणात आहे ? केवळ मंचावर येवुन शब्दांचे मोठे तोफगोळे फेकणे, इतक्या सिमित भावात साहित्यिक नाहीत नां ? हे सर्व‌ लिहिण्याच्या मागे *"डाॅ. जीवने ह्यांनी श्रीपाल सबनीसांना पाणी पाजले ?"* हा माझा आशय नाही.‌ सदर प्रश्नांची उत्तरे ही साहित्याचे एकसंघीकरण करायचे असल्यास आवश्यक आहे. आणि शेवटी *"जातीविहिन समाज निर्मिती"* ह्या विचारा संदर्भात डाॅ. श्रीपाल सबनीस हे उत्तर देणार काय ?  ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या अपक्षेत ...!!!


* * * * * * * * * * * * * * * * * * 

(नागपूर, दिनांक १९ एप्रिल २०२२)

No comments:

Post a Comment