Friday 25 March 2022

 ✍️ *इ. झेड. खोब्रागडे ह्यांची चवदा तास ही अभ्यासाची मागणी बनाम आंबेडकरी मिशन दिशा - दशा आणि अवदशा...?*

   *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७

एक्स व्हिजिटींग प्रोफेसर, युनिवर्सिटी ऑफ डॉ. ‌आंबेडकर सोसल सायन्स, महु (म.प्र.)

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

मो. न. ९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२


     माजी सनदी अधिकारी आयु. *इ. झेड. खोब्रागडे* ह्यांचा *"चवदा तास अभ्यास : विकासाचा ध्यास"* हा लेख अमरावती मधुन निघणा-या‌ एका दैनिकातील काल माझ्या वाचनात आला. आणि *इ.‌ झेड.‌ खोब्रागडे* ह्यांनी महाराष्ट्र सरकारला, सदर अभियान राबविण्या संदर्भात एक आग्रही पत्र पाठवुन‌, ती मागणी केली आहे. सदर मागणी शासन मान्य करणार काय ? हा मुद्दा थोडासा बाजुला सारुन, सदर मागणी ही *"आंबेडकरी मिशनच्या जडण घडणीला सशक्त करणारी आहे / असणार काय ?"* ह्या प्रश्नाचा मी विचार केला. कारण मागिल दशकातील स्मृतीशेष *वामनराव गोडबोले / मा. डो.‌ पंचभाई / तु. ग. पाटील / ह.‌ मो.‌ मजगौरी / वि. रा. वाशिमकर इ.* ह्यांचा कालखंड हा आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने फार मोलाचा होता. तशी माझी तिन - चार वेळा वामनराव गोडबोले ह्यांच्यासोबत, एक वेळा मा. डो. पंचभाई ह्यांच्यासोबत तर बरेच वेळा वि. रा. वाशिमकर ह्यांच्यासोबत माझी प्रत्यक्ष भेट ही झालेली आहे. धम्मावर मी त्यांच्या सोबत बरीच चर्चा केली आहे.

     *"रिपब्लीकन स्टुडंट फेडरेशन"* (RSF) ह्या राष्ट्रिय संघटनेचे *वि. रा. वाशिमकर* हे "राष्ट्रिय अध्यक्ष" होते. आणि आंबेडकरी विद्यार्थी चळवळीवर ह्यांच्या सोबत माझी नेहमी चर्चा होत असे.‌ कधी कधी तर ते मला आपल्या वेदना ही सांगित असत. *ह. मो. मजगौरी* हे माझ्या आईचे सख्ये आते भाऊ.‌ ते भारत सरकारच्या एका आयोगावर ही सदस्य म्हणुन‌ कार्यरत होते.‌ आणि मजगौरी साहेबांचा संबध हा *"दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया"* (TBSI) ह्या परम पुज्य डॉ. आंबेडकर ह्यांच्या संस्थेसोबत आहे. ते TBSI च्या अकरा लोकांच्या ट्रस्टीमध्ये होते. त्यांनीच *"भारतीय बौध्द महासभा"* ह्या संघटनेची सुधारीत स्कीम लिहिली. ह्याचा मी साक्ष आहे. कारण संस्थेचे राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ. स. वि. रामटेके* हे हरिश मो. मजगौरी साहेबासोबत महिण्यातुन एक - दोन‌ वेळा माझ्या घरी येत असत. आणि माझ्या *"स्टडी रुममध्ये"* त्यांची चर्चा मी नेहमी ऐकत असे. काही का असे नां, *"त्या आपल्या सर्व स्मृतिशेष मान्यवर मंडळींच्या आंबेडकरी चळवळी संदर्भात सत्य निष्ठा / समर्पण / प्रामाणिकता / भावना आणि त्याग हा वादातीत आहे."* आणि त्या सर्व मान्यवरां सोबत माझे काही विषयात वैचारिक मतभेद ही होते.‌ तरी ही त्यांचे मोठेपण हे आज ही मला मान्य आहे. त्यांच्या प्रती मला नितांत आदर ही आहे. त्यातील एक विवादाचा विषय म्हणजे *"१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन."* तर काहींच्या मते तो दिवस म्हणजे *"धम्मचक्र अनुवत्तन दिन."* तर काहींच्या मते तो दिवस म्हणजे - *"अशोका विजया दशमी"* हा दिवस होय.

     माझ्या मते डा. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या *"धम्म दीक्षा समारोह दिन"* हा *"अशोका विजया दशमी"* हाच असायला हवा. सन १९५६ ह्या वर्षी *अनायसे* त्या दिवशी दिनांक ही १४ आलेली असावी.‌ बुध्द काळात *"लुनार कँलेंडर"* नुसार तिथीची गणना होत असे.‌ तर आज *"सोलर कँलेंडर"* नुसार तिथीची गणना होत आहे.‌ सदर दोन‌ कँलेडर मधिल तिथीचा फरक लक्षात घेता, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी *"तथागत बुध्द ह्यांच्या महापरिनिर्वाणाला २५०० वर्ष"* पुर्ण झालेले होते.‌  आणि *चक्रवर्ती सम्राट अशोक* ह्यांच्या *"कलिंग युध्दाच्या विजय"* ह्या दिवसाला *२००० वर्ष पुर्ण* झालेले होते. म्हणुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी त्या दिवसाची निवड केलेली असावी.‌ आणि ती सुध्दा *नागपूर* शहरात. अर्थात *"नाग बौध्द भुमीवर !"* मला वाटते आपण *"धम्म दीक्षा दिन"* हा दिवस *"अशोका विजया दशमी"* ह्या दिवशीचं साजरा करायला हवा. तरी पण *"१४ ऑक्टोबर"* ह्या दिवशी ही आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना अभिवादन करण्यास हरकत घेण्याचे काहीचं कारण नाही.‌ आणि हा विवाद असाचं समापचाराने सोडविला जावा, असे माझे मत आहे. आणि *"प. पु.‌ डॉ. आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती"* सदर दिवशी जी सौतेला वागणुक ठेवीत आहे.‌ जसे - लवकर लाईट बंद करणे, लोकांना दीक्षाभूमीवरुन बाहेर काढणे, ह्या आचरणापासुन परावृत्त होणे गरजेचे आहे. त्या दिवशी लोकांकरिता सर्व सोई - सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे मला वाटते.

      स्मृतिशेष वामनराव गोडबोले / मा.‌ डो.‌ पंचभाई / तु. ग. पाटील ह्यांच्या काळातील *"१४ आकड्याच्या जुना विवाद"* आता हा आम्हाला संपवायला हवा. जसे - प. पु.‌ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १४ वे रत्न आहेत.‌ जन्म तारीख ही १४ आहे.‌ आणि धम्म दीक्षा तारिख ही सुध्दा १४ आहे.‌ म्हणुन जर माजी सनदी अधिकारी आणि आमचे धम्म मित्र *ई. झेड.‌खोब्रागडे* हे महाराष्ट्र शासनाला *"१४ तास अभ्यास / १४ तास काम"* ही मागणी करीत असल्यास, ते आंबेडकरी समाजाला काय दिशा देत आहेत ? हा मुख्य प्रश्न आहे. *"आपली सशक्त आंबेडकरी चळवळ ही तळागळाला गेलेली आहे."* आपल्याला तिच्या बांधणी करिता लक्ष देणे, हे फार गरजेचे आहे. *"दीक्षाभूमी"* वरुन *"प्रशिक्षित कार्यकर्ता"* घडणीचे काम कसे होईल ? ह्यावर उपाय करायचा आहे. ‌"दीक्षाभूमी" ही आंबेडकरी चळवळीचे *"आंतरराष्ट्रिय केंद्र"* कसे बनेल ? हे प्रत्यक्षात आणायचे आहे.‌ *"शिस्तीचे पालन"* करणे, हे ही शिकायचे आहे. परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी १ जुलै १९५६ रोजी प्रबंधक एस.‌एस. रेगे ह्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मुंबई ला *"प्रशिक्षित कार्यकर्ता"* घडविणारी शाळा उघडलेली होती.‌ काही कारणामुळे ती शाळा बंद पडली. तशी शाळा आपल्याला नव्याने सुरु करावी लागणार आहे. *"राष्ट्रिय स्वयं सेवक संघ"* (RSS) ह्या कट्टरवादी ब्राम्हणी संघटन द्वारा महाल - रेशीमबाग ह्या केंद्रातुन *"कार्यकर्ता"* घडणीचे जे काम निरंतर सुरु आहे, आपल्याला ही त्याच प्रकारे आपले मिशन सुरु कसे होईल ? ह्यावर *"ब्लु प्रिंट"* तयार करावयाचा आहे. पण आम्ही कोणत्या दिशेने जात आहोत ???

      आमचे धम्म मित्र *ई. झेड. खोब्रागडे* ह्यांनी आंबेडकरी साहित्याला फाटा देवुन *"संविधान साहित्य"* नावाने अलग अशी दुकानदारी उघडण्याचा *"असफल प्रयत्न"* चालविला होता. सदर प्रयत्न *"माझ्या तिव्र आंदोलनामुळे"* तो सफल झालेला नाही. *"भारतीय संविधान"* हे अजिबात "Legal Book" (कायद्याचे पुस्तक) नाही. तर ते *"Legal Documents" (कायद्याचे दस्तावेज)* आहे. साहित्य मान्य नसेल तर साहित्याचा निषेध ही  केला जावु शकतो.‌ निषेध साहित्याची आपल्याला होळी ही करता येते. *"काय आपण लोक, भारतीय संविधानाची होळी झालेली (?) बघणार आहोत ?"* इ झेड खोब्रागडे ह्यांनी तर *"गांधीवादी संघटनेच्या"* आर्थिक मदतीने नागपुरला *प्रा. रावसाहेब कसबे* ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत *"आंबेडकरी परिषद"* घेतली होती. रावसाहेब कसबे ह्यांनी तेव्हा *"आंबेडकरवाद्यांनी महात्मा गांधी ह्यांना समजुन घेणे गरजेचे आहे."* असे विधान केले होते. त्या विरोधात *मी* स्वत: एक लेख लिहुन, रावसाहेब कसबे / इ.‌ झेड.‌ खोब्रागडे ह्यांचा तिव्र निषेध केला होता. ‌*"जागतिक (?) आंबेडकरी (?) साहित्य महामंडळ" (?) ह्या खाजगी संस्थेचे स्वयं घोषित अध्यक्ष (?) *दिपक खोब्रागडे / सुजित मुरमाडे* ह्यांनी जातीयवादी असणारे *गिरिश गांधी* ह्यांच्या स्वागताध्यक्ष पदी आणि *प्रा. डॉ. ‌यशवंत मनोहर* ह्यांच्या अध्यक्षतेखाली *"प्रथम जागतिक आंबेडकरी साहित्य परिषद"* हे आयोजन जाहिर केले होते. सदर परिषदेच्या विरोधात *"माझा लेख"* हा सदर परिषद रद्द करण्यास कारणीभुत झाली.‌ आता पुन्हा *प्रा.‌ दिपक खोब्रागडे / सुजित मुरमाडे* ही जोडी तसा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा तो प्रयत्न हानुन पाडण्याची जबाबदारी, ही तर आपण सर्वांची आहे. आमचे मित्र आणि प्रसिध्द (?) साहित्यिक *लोकनाथ यशवंत* हा आंबेडकरवादी शब्द नाकारुन, स्वत:ला *"वादीहिन कवि"* म्हणवुन घेत आहे. दलित साहित्यिक *शरणकुमार लिंबाळे* हा स्वत: *"सरस्वती नावाने पुरस्कार"* घेण्यास फार धन्यता मानीत आहे. प्रश्न असा की, *"जर बुध्दीवंत मान्यवर भरकटलेले असतील तर, समाजाला दिशा काय मिळणार ?"*

      माझा फार जिवलग मित्र *प्रा.‌ प्रदिप आगलावे* (आता ?) हा महाराष्ट्र शासनाच्या डॉ. ‌बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशन समितीवर *"सदस्य सचिव"* ह्या फार मोठ्या पदावर नियुक्त झाला. आणि काही दिवसा आधी प्रदीप च्या *"फार मोठ्या प्रयासाने"* डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा *"३ - १ जनता"* हा खंड प्रकाशीत केल्याची बातमी मिडियात वाचण्यात आली. दलित पँथरचे नेते आणि आमचे मित्र *प्रकाश बनसोड* ह्यांनी *प्रा.‌ डॉ. प्रदिप आगलावे* ह्यांच्या सदर प्रसिध्दीच्या *"विरोधात एक तक्रार केल्याची"* बातमी मला मिळाली. *प्रकाश बनसोड* ह्यांच्या मते, "प्रा. प्रदिप आगलावे ह्याची सदस्य सचिव पदावर नियुक्ती ही २२ जुन २०२१ रोजी झाली. आणि *"जनता ३ -१"* हा खंड प्रदिपच्या नियुक्तीच्या आधीच पुर्ण तयार झालेला होता. तत्कालिन सदस्य सचिव आणि आमचे धम्म मित्र *डॉ. कृष्णा कांबळे"* ह्यांनी सदर खंड पुर्ण तयार करुन, *"संदेश / मनोगत"* आदी सर्व‌ लिहुन सदर *"जनता खंडाचे"* ते प्रकाशन करणार होते.‌ परंतु कोरोनामुळे डॉ. ‌कांबळे ह्यांनी जगाचा निरोप घेतला. तेव्हा सदर त्या खंडातील *डॉ. कृष्णा कांबळे* ह्यांनी स्वत: तयार केलेल्या *"जनता ३ - १"* खंडातील तमाम *"संदेश / मनोगत / आणि कृष्णा कांबळे ह्यांचे नाव"* असणारी पाने *प्रा. प्रदिप आगलावे* ह्यांनी *"फाडुन"* स्वत:च्या नावाचा गवगवा केला आहे. *प्रा प्रदिप आगलावे* ह्याची ही कृती (?) *"गैरकायदेशीर / नियमबाह्य / अधिकार क्षेत्र बाहेरील असल्याची"* ती तक्रार आहे. बघु यां...! सदर तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे केंद्रिय मंत्री आणि आमचे मित्र *डॉ. नितिन राऊत* हे प्रदिप ह्याला वाचवितात की "सदस्य सचिव" ह्या पदावरून शहिद करतात काय ? हा आता फार ज्वलंत विषय आहे. *"तसा प्रदिप हा फार अफलातुन प्राणी आहे...!"* आणि दीक्षाभूमी स्मारक समिती वर *"ट्रस्टी"* म्हणुन आता नव्याने त्याची नियुक्त झालेली आहे. दीक्षाभूमी समिती सुध्दा प्रदिपच्या *"ट्रस्टी म्हणुन नियुक्तीचा विषय"* (?) कसा घेणार आहे ? हे सुध्दा बघु यां. तसे बघता प्रदिप ह्यांनी लिहिलेली पुस्तके ही *"अभ्यासक्रम"* संबधीची आहेत. अर्थात काही नामांकित संशोधकाची ती *"कॉपी एंड पेस्ट"* अशी आहेत. प्रा प्रदिप आगलावे ह्याच्या नावाने *"समाजशास्त्रज्ञ"* म्हणुन कुठलाही *"नवा शोध"* नाही. कुठलीही *"थेेअरी"* नाही. किंवा आंबेडकरी साहित्यामध्ये नविन अविष्कार नाही...!!!

      *"भारताचे संविधान"* ज्या वास्तुमधुन अस्तित्वात आले, ती प्राचिन वास्तु म्हणजे *"संविधान सभा."* मी आणि माझा मित्र - आकाशवाणी चे अधिकारी *अमर रामटेके* आम्ही दिल्लीला असतांना, *"केंद्रीय लोक सेवा आयोग"* (UPSC) येथे कार्यरत वरिष्ठ अधिकारी मित्राचा मला फोन आला. त्याने UPSC येथे मला भेटायला बोलावले.‌ आणि येतांना कोणत्या गेटमधुन आत यायचे आहे, ही ही सुचना दिली. त्याप्रमाणे आम्ही त्याला भेटायला गेलो. आमची तेव्हा *आंबेडकरी चळवळ ते संविधान"* ह्या विषयावर चर्चा रंगली. आणि तो माझा मित्र मला म्हणाला की, येथुन अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर, कस्तुरबा गांधी रोडवर *"प्राचिन संविधान सभा"* ही वास्तु आहे. मी त्याला भेट द्यावी.‌ सदर वास्तुला आम्ही भेट दिल्यांनतर, मला तर चक्क *"शॉकचं"* बसला. सदर वस्तुच्या समोर *"संविधान सभा नावाचा एक दगड"* होता. आणि अगदी त्याच्याचं मागे सदर प्राचिन वास्तूमध्ये होता - *"ऑफिसर वाईन क्लब...!"* ही कांग्रेस सरकारची फार मोठी उपलब्धी होती (?) तेव्हा कांग्रेसी धारेचे *डॉ. मनमोहन सिंग* हे प्रधानमन्त्री होते. मी नागपुरला आल्यावर राष्ट्रपती / प्रधानमन्त्री ह्यांना निवेदन करुन, सदर प्राचिन स्थळावर *"डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनेशनल कॉंस्टीट्युशन एंड लॉ अकादमी एंड रिसर्च सेंटर"* ही उघडण्याची मागणी केली. सदर विषयावरील लेख *"महाराष्ट्र टाईम्स"* वर्तमान पत्रात प्रकाशीत ही झाला. ई. झेड. खोब्रागडे पासुन‌ ब-याच सामाजिक लोकांना ही मागणी पुढे करण्या विषयी बोललो. ह्या विषयावर ती सर्व मंडळी मौन होती. आता माहिती पडले की, *भाजपा सरकारात* ती प्राचिन वास्तु तोडण्यात आली आहे. प्राचिन हेरिटेज वास्तु उध्वस्त करता येते काय ? हा प्रश्न तुम्ही विचारवंता करिता.

     आंबेडकरी विचारवंत *डॉ. नरेंद्र जाधव* ह्यांनी "डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या सर्व भाषणाचे" *तिन खंडात* संग्रहीकरण केले आहे. खरचं ही डॉ जाधव साहेबांची चांगली उपलब्धी आहे.‌ आणि डॉ. नरेंद्र जाधव हे *"योजना आयोगावर"* असतांना त्यांच्या माझ्या कधी कधी भेटी व्हायच्या. आता ते राज्यसभा सांसद आहेत. पण अलिकडे तर त्यांचा आवाज कुठेच दिसत नाही. केंद्रिय राज्य मंत्री आणि रिप नेते आयु. *रामदास आठवले* ह्यांच्याबद्दल न बोललेलेचं बरे ! सर्कस मधिल जोकर असा तो प्रकार आहे. रिप नेते (?) - बहुजन / वंचित नेते *एड. प्रकाश आंबेडकर* ह्यांच्यासोबत *माझ्या* झालेल्या नागपूर भेटीची / चर्चा आठवण झाली. ‌सात - आठ वर्षाआधी रवि भवनात एड.‌ प्रकाश आंबेडकर समवेत *प्रा.‌ रणजीत मेश्राम / विमलसुर्य चिमणकर / नत्थु नाईक / डॉ. मिलिन्द माने / शंकरराव मानके / राजु लोखंडे* ह्यांच्या उपस्थितीत एड. प्रकाश आंबेडकर ह्यांना मी उपस्थित केलेले प्रश्न आणि दिलेली ती *"राजनिती सिख"* ते कधीचं‌ विसरणार नाहीत. पण प्रकाशरावांचे हे एक मोठेपण होते की, सदर भेटीच्या *दोन दिवसानंतर* त्यांनी माझी आठवण केली. आणि मला *प्रा.‌ रणजीत मेश्राम* ह्यांचा त्या संदर्भात फोन होता की, *"धम्ममित्र, बाळासाहेब ह्यांच्यावर तु काय जादु केली ? त्यांनी तर तुझी फार आठवण केली."* महत्वाचे म्हणजे प्रा.‌ रणजीत मेश्राम हे तेव्हा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते.

    मित्रांनो, हा सर्व *इतिहास* लिहिण्याचे कारण असे आहे की, कुणी *गगन मलिक* नावाचा फिल्मी नाचा, विदेशातुन *बुध्द मुर्ती* आणण्याची फसवी मध्यस्थी करतो आणि भारतामध्ये महाठग - *नितिन गजभिये* सारख्या दलाल / एजंटाकडुन तिची विक्री करतो, आणि *"बाजारातील किमती पेक्षा नितिनचा दर कमी आहे,"* म्हणुन आम्हीचं अनैतिक लोकांकडुन‌ बुध्द मुर्ती विकत घेतो. अर्थात *"आम्हीच पैसा वाचतो म्हणुन त्या अनैतिक व्यवहाराला बळ देतो."* मग आम्ही सुध्दा अनैतिक व्यवहाराची कास धरतो.‌ तर आम्ही आंबेडकरी समाजाला काय दिशा देत आहोत...? आम्हाला आमचे बालपन आज ही आठवते. *"नागपुरच्या इंदोरा विभागाचा तो दरारा आठवतो."* देशातील आमच्या लोकांचा दरारा आठवतो. आज तो दरारा मेलेला आहे. *"किंबहुना आंबेडकरी माणुसचं हा मेलेला आहे.‌..!"* म्हणतात नां, *"झोपेल्या माणसाला जागे करता येते.‌ पण झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला नाही.‌ "* प्रश्न असा आहे की, आज आंबेडकरी चळवळीची दिशा काय ? की दशा आणि अवदशा  ??? एक भयाण अनुत्तरीत प्रश्न...!!!! जय भीम.


* * * * * * * * * * * * * * * * * * * *

(नागपूर, दिनांक २५ मार्च २०२२)

* लेखक हे मध्य प्रदेश, महु (आंबेडकरांचे जन्मस्थळ) येथिल *डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ* येथिल एक्स व्हिजिटींग प्रोफेसर आहेत.

No comments:

Post a Comment