Saturday 14 August 2021

 ✍️ *जीवन संघर्षातील दु:खमय अश्रुंना सौंदर्य किनारा देणारा झरा : बुध्द..!!!*

    *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*, नागपूर

   राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन  सेल

     मो.न. ९३७०९८४१३८/९२२५२२६९२२

     

       'दलित' (?) हा शब्द आता मात्र फार विवादाचा विषय झालेला आहे. आणि ह्या 'दलितत्व' व्यवस्थेला आपण कां बरे आणि कधीपर्यंत स्विकारायला हवे ? हा सुध्दा एक फार महत्वपुर्ण प्रश्न आहे. निश्चितचं शोषित - पिडित - त्रासित ही वेदना भोगणारा भाव अस्पृश्य समाजावर लादला गेला होता. पुढे त्याला 'दलित' ह्या गोंडस शब्दाचे नामकरण हे दिले गेले. आणि त्या संदर्भीत साहित्य लिखाणाला 'दलित साहित्य' असे संबोधल्या जावु लागले. आणि *"दलित ह्या शब्दाने व साहित्याने समस्त जगतात आपले एक अलग अस्तित्व ही निर्माण केलेले होते."* पुढे दलित ह्या नावाने संघटना ही जन्माला आलेल्या होत्या. महत्वाचे म्हणजे ह्या सर्व घटना, १४ आक्टोंबर १९५६ च्या नंतरच्या आहेत. आणि तो क्रांती दिवस हा समस्त अस्पृश्य माणसाच्या मनात, नविन पुनर्जन्म झाल्याचा बोध करणारा असा पावन दिवस होता. *"प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी अस्पृश्य ह्या समाजाला, "बुध्द चेतना" भरण्याचा तो एक सिंहनाद होता. माणसाच्या मनात संघर्ष क्रांतीशक्ती रूजविण्याचा तो आर्त साद होता."* असे असतांना दलित शब्दाची ही नामावली धम्म क्रांतीनंतर आम्ही आपल्यावर तेव्हा कां बरे लादली होती...? हा एक गहण / चिंतनीय प्रश्न संशोधनाचा विषय म्हणायला हरकत नसावी. *"कारण बुध्द साहित्य निर्माणाचा प्राचिन इतिहास ही एक साक्ष आहे."* आणि "आंबेडकरी साहित्य व चळवळ" ही सुध्दा बुध्द चेतना भावाकडे घेवुन जाणारी एक महत्वपुर्ण कडी आहे...! 

      "दलित साहित्य" म्हणजे ज्वलंत विद्रोह, नकार, हुंकार...! तेव्हा दलित साहित्यात सौंदर्यशास्त्र कुठे आहे ..? असा कुत्सित प्रश्न तथाकथित मराठी साहित्यिक तेव्हा करू लागलेले होते. पण आंबेडकरी साहित्य असो वा, प्राचिन / अर्वाचिन बुध्द साहित्य असो, ह्या साहित्यामध्ये सौंदर्यशास्त्र कुठे आहे...? ही विचारायची हिंमत त्या तथाकथित मराठी साहित्यिक मंडळीमध्ये नाही...!!! *"कारण आंबेडकरी साहित्य असो किंवा बौध्द साहित्य असो, ह्या साहित्यामध्ये विद्रोह आहे, नकार आहे, हुंकार आहे, नैतिकता आहे, मानवता आहे, सामाजिक भाव आहे, निसर्ग आहे आणि सौंदर्य शास्त्र ही आहे...!"* आता आपण मराठी भाषेतील तथाकथित समस्त साहित्यिक मंडळींना, कालीदासाच्या लिखाणावर प्रश्न करायला हवेत. ललित, फलित आणि चर्वित ह्या साहित्यावर आपण प्रश्न करायला हवेत...! *"कालीदासाच्या साहित्यात नैतिकता आहे काय...? काम वासना / भोगवाद, स्त्री नग्नता, प्रेम मिलन ही भाव रचना म्हणजे भाषा सौंदर्य शास्त्र आहे काय?"* आणि हा हिनभाव जोपासणा-यां मंडळींना, आमचे न्यायप्रिय (?) असणारे साहित्यिक नैतिकवाद, समाजवाद, मानवतावाद आणि निसर्गवाद ह्या विषयावर प्रश्न विचारण्याची हिंमत कां बरे करीत नाहीत...? आणि मग त्यांच्यासोबत *"सौंदर्यशास्त्र "* ह्या विषयावर चर्चा करता येईल. पण असे न होणे, हा एक चिंतनाचा विषय आहे.

     महात्मा ज्योतिबा फुलेंच्या लिखाणावर व्याकरण भावाचा शोध घेणारे महामहिम असो वा, अण्णाभाऊ साठेंंचा वेदना हुंकार न समजणारे नादारी असो वा, बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी दिलेला *"भारत राष्ट्रवाद - संविधानिक राष्ट्रवाद - मानवता राष्ट्रवाद"* समजुन न घेणारी बिन-अकल मदारी असो वा, भदंत अश्वघोष (कालीदासाचा कालखंड हा अश्वघोष ह्यांच्या बराच नंतरचा आहे) ह्या बौध्द आद्य साहित्यिकाची *"सौदरानंद / बुध्दचरित्र"* हे नैतिकवाद सांगणारे बुध्दवादी साहित्य असो वा, मग ही महासुपीके *बुध्द आदर्शवाद - बुध्द नैतिकवाद - बुध्द निसर्गवाद - धम्ममय क्रांतीवाद हे कसे समजणार आहेत...?* हा गंभिर प्रश्न आहे ! ज्यांनी बुध्दाच्या मानवतावाद तत्वज्ञानाचा आणि साहित्याचा चिंतनमय असा अभ्यास केलेला नाही, अशी ही महाशय, प. पु. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना काय समजुन घेणार आहेत ? आणि जगात *"बुध्द हवे की युध्द"* ही होणारी विश्व चर्चा, सहज अशी म्हणावी काय ...???

    ललित / फलित कथानकातील असो की, ते नाटकातील असो की, वा चलचित्रामधिल असो, त्यामध्ये दलित नायक / नायिकांचे चारित्र, हे विशेषत: फार हिन दाखविले जात असते. आणि जर कुठे कधी दलित नायक / नायिकेला चारित्र संपन्न असे दाखविले गेले असेल वा जात असेल तर, ती पात्र घटना ही अपवाद स्वरूपात म्हणता येईल. *"आजच्या सिनेसृष्टीत अंग प्रदर्शन करणा-या नट्या घ्या किंवा सिने निर्मात्यांसोबत अनैतिक शय्या करणारा तो भाव घ्या, ह्यात दोन्ही पक्ष हा कोणता नैतिकवाद जोपासणारे आहेत...?"* ह्याला आम्ही काय म्हणायला हवे..? आणि सदर पात्र हे कोणत्या वर्गाचे प्रतिबिम्ब करणारे आहे...? *"झोपडपट्टीत खडतर आयुष्य जगणा-या ह्या शोषित समाजाने, धम्म क्रांतीनंतर ह्या सहासष्ट वर्षाच्या अल्पश्या काळामध्ये, शोषक वर्गासमक्ष घेतलेली उंच भरारी, ह्याचे वैचारिक मोजमाप आपण कोणत्या ह्या वैज्ञानिक मापाने करणार आहात...?"* हा खरा प्रश्न आहे. आणि जगाच्या इतिहासात ती घटना एक मैलाचा दगड ठरलेली आहे..! जगाचा तो एक इतिहास झालेली आहे.

      *"साहित्य आणि चळवळ"* ही खरे तर माणसाच्या जीवनाचा आरसा असायला हवा. *"केवळ ललित / फलित / चर्वित साहित्याचा मोठा उदो उदो केल्याने ती जनमाणसात घट्ट पाय रोवणार आहे, ह्या हिन भावातुन बाहेर पडणे गरजेचे आहे. कारण ती सवर्णभाव जोपासणा-या ४% घटकाचा एक प्रतिबिंब आहे...!"* ती फक्त शोषक वर्गाची मायबोली आहे. आम्ही अश्या साहित्यिक वर्गाच्या मोहजालात फसायला नको ! *"बुध्द हे मानवतावाद, नैतिकवाद, समाजवाद, निसर्गवाद, सौंदर्यशास्त्र ह्या विचारांचा आवाज आहेत...!"* जीवन संघर्षातील दु:खमय अश्रुंना सौंदर्य किनारा देणारा तो एक झरा आहे. खरा प्रश्न येथे देववाद आहारी जाण्याचा आहे. धर्मांधवाद आजाराचा आहे. जातीयवाद फोफावण्याचा आहे. हा *"जटील गुंता सोडविण्याचे खरे सामर्थ ललित / फलित / चर्वित साहित्य आणि चळवळीत आहे काय...?"* जर ते सामर्थ तुमच्यात नसेल तर, बुध्द साहित्य आणि चळवळीतील *"व्यक्ती आदर्शवाद - समाज आदर्शवाद - राष्ट्र आदर्शवाद"*  आम्ही जोपासायला हवा...! *"बुध्द सौंदर्य किरणाच्या"* माध्यमातुन दु:खमय अश्रुंना पुसण्याकरिता हे फार गरजेचे आहे...!!!


* * * * * * * * * * * * * * * * * *



No comments:

Post a Comment