Saturday 5 October 2024

 ✍️ *मराठी - पाली भाषेला केंद्र शासनाकडून मिळालेला अभिजात दर्जा आणि ब्राह्मण्यीक क्षेत्रातील साहित्यिक आनंद...?*

      *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

मो. न‌. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


         केंद्र सरकारने अगदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मागिल १२ वर्षांपासून असणारी जुनी मागणी - *"मराठी भाषेला अभिजात दर्जा"* ही ३ सप्टेंबर २०२४ रोजी पुर्ण केली आहे.  सोबतचं *"पाली / प्राकृत / बंगाली / आसामी"* अशा ह्या अन्य चार भाषांना ही *"अभिजात दर्जा"* दर्जा हा दिलेला आहे. ह्यापुर्वी *"संस्कृत / तामिळ / तेलगु / कन्नड / मलयालम / उडिया"* ह्या भाषेला *अभिजात दर्जा* हा दिला गेला होता. तेव्हा हा आनंद आपण कशाप्रकारे तो साजरा मानावा ? *"निवडणुकीतील राजकारण किंवा राजकारणातील निवडणुक"* हा अहं प्रश्न आहे. तसे बघता *"अभिजात दर्जा"* मिळावा ही न्याय मागणी पूर्ण होण्यासाठी असा कालखंड लागणे, ही मोठी शोकांतिका आहे. ह्या पुर्वी माझ्या काही मराठी / हिंदी साहित्य लिखाणात *"अभिजात दर्जा"* संदर्भात माझे विचार हे लिहिलेले आहेत. *"अभिजीत दर्जा"* मिळण्यासाठी काही निकष संदर्भ ही आहेत. सदर निकषांमध्ये बसण्यासाठी मराठी भाषीक मंडळींनी आणि साहित्यिकांनी, कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेलगोळ"* ह्या एका गावी सापडलेल्या इसवी १०३९ च्या *"मराठी शिलालेख"* हा संदर्भ दिला होता. तसेच काही वर्षांनी *अक्षी* गावातील तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे *"मराठी शिलालेख "* इसवी १०१२ मध्ये शोध लागला. तसेच सोलापूर जिल्ह्यातील *हत्तरसंग कुंडल* ह्या गावात सुध्दा इसवी १०१८ मध्ये *"मराठी शिलालेख"* आढळुन आला होता. परंतु *"राजे शिवछत्रपती"* ह्यांच्या कालखंडात (इसवी १६३६ - १६८०) *"मराठी शिलालेख"* हे कां लिहिण्यात आले नाहीत ? हा अहं प्रश्न उत्पन्न होतो. कारण शिवाजी कालखंडात लिहिलेले सर्व शिलालेख हे *"संस्कृत भाषेतील"* आहेत. अर्थात *"मराठी भाषेवरील ब्राह्मणी अधिपत्य आपण स्वीकारावे वा नाकारावे ?"* आता तर हा विषय संशोधनाचा विषय झालेला आहे. महत्वाचे असे की, मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळण्याकरीता राज्य सरकारकडुन मराठी भाषेची प्राचिनता सिध्द करण्यासाठी *"सातवाहन काळातील"* (बौध्द साम्राज्य) **नाणेघाट शिलालेखाचा"* दाखला दिला आहे. शिलालेखात वापरलेली भाषा ही *"महाराष्ट्रीय प्राकृत"* असुन लेखाची लिपी ही *"ब्राम्ही"* आहे. 

         *"अभिजात भाषा पाठपुरावा समिती"* चे अध्यक्ष *ज्ञानेश्वर मुळे* असो वा *"अभिजात मराठी भाषा समिती"* चे अध्यक्ष *प्रा. रंगनाथ पठारे* असो, ह्या महाविद्वतांना उशिरा कां होईनां सुबुद्धी आली ! ही फार मोठी उपलब्धी म्हणायला हवी. *"पाली प्राकृत प्राचिन भाषा"* ही ब्राह्मणी घे-यातुन *"अभिजात भाषा"* झाली, त्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद द्यायला हवेचं नां ! सदर निर्णयामुळे पाली - प्राकृत भाषेला *"आर्थिक नियोजनात"* (अनुदान इत्यादी) किती / कसा फायदा होणार आहे ? प्रतिष्ठा ती काय मिळणार आहे ?  भारतातील *"समस्त विद्यापीठात"* ती भाषा शिकण्याकरीता उपलब्ध होणार वा कसे ? पाली प्राकृत ह्या भाषेचे *"आधुनिक ग्रंथालय"* उपलब्ध होणार आहे काय ? समस्त राज्यात *"पाली प्राकृत विद्यापीठ"* निर्मिती होणार आहे वा कसे ? हे काळाच्या ओघात दिसणार आहे. परंतु हे चिरकाल सत्य आहे की, *"मराठी भाषा / साहित्य ब्राह्मणवादाला नविन भरारी आलेली आहे."* जरी ब्राम्हणवादी वंशावळीने ही *"इंग्रजी माध्यमाची"* (कान्वेंट) बांधिलकी स्वीकारली असली तरी ! *"परदेश गमन, परदेश वास्तव्य"* हे *"धर्म विरोधी कृत्य"* आता कुठे तरी राहिलेले आहे ? आता परदेशात *"मराठी भाषा चलन"* भावनेला गती मिळणार आहे नां ! नवी दिल्लीत होणा-या *"९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला"* आता धार येणार आहे. तसेच *"विद्रोही साहित्य सम्मेलन"* काय निर्णय घेणार आहे ? हे सुध्दा आपण बघु यां. अलिकडे *प्रा. रावसाहेब कसबे / डॉ. श्रीपाल सबनीस / ज. वी. पवार / शरणकुमार लिंबाळे / अर्जुन डांगळे / प्रा. डॉ. यशवंत मनोहर* सारखी काही इहवादी मोठी साहित्यिक मंडळी ही *"जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ"* नावाच्या तथाकथित *"षद्ममय साहित्य वादाच्या"* गळाला लागलेली दिसुन येतात.

      मराठी ब्राम्हणी साहित्यिकांनी *"शिर्ष अग्रणी कवि"* म्हणुन ब्राम्हण धर्मीय - *मुकुंदराज* (१२ वी शती) / *संत ज्ञानेश्वर महाराज* (१२/०८/१२७५ - २/१२/१२९६) ह्यांना प्रस्थापित केले. परंतु त्याच कालखंडातील *शिंपी* ह्या जातीचे असलेले मोठे *संत नामदेव महाराज* (२६/१०/१२७० - ३/०७/१२५०) /  संत नामदेव महाराज ह्यांना वयाने वरिष्ठ असलेल्या *संत जनाबाई* (१२५८ - १३५०) / *महार* ह्या जातीचे असलेले मोठे *संत चोखामेळा* (१२७३ - १३३८) ह्यांना मात्र पुर्णतः दुर्लक्षित केले गेले. ही संत मंडळी *संत ज्ञानेश्वर* ह्यांचे समकालीनचं नाही तर, वयाने क्वचित मोठे ही दिसुन येतात. *संत नामदेव महाराज / संत जनाबाई / संत चोखामेळा* ह्यांना दुर्लक्षित करण्याचे कारण काय असावे ? हे आम्हाला समजून घ्यावे लागणार आहे. कारण ही सर्व संत मंडळी *"पंढरपुरी विठोबा अर्थात बुद्ध"* ह्यांना शरण गेलेली आहेत. तर *मुकुंदराज / संत ज्ञानेश्वर* हे ब्राह्मणी व्यवस्थेला पोषक असल्याने त्यांचा परिपाक केला गेला. ह्यानंतर आलेले संत मंडळी - *संत नरहरी सोनार* (११९३ - १३१३) / संत चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई* - पत्नी (१४ वे शतक), *संत निर्मलाताई* - बहिण (१४ वे शतक), *संत कर्ममेळा* - भाऊ (१४ वे शतक) / *ब्राह्मण* धर्मीय असलेले *संत एकनाथ महाराज* (१५३३ - १५९९) / *वाणी* ह्या जातीचे असलेले *संत तुकाराम महाराज* (२१/०१/१६०८ - १९/०३/१६५०) / संत तुकाराम महाराज ह्यांचे लेखनिक असलेले आणि *तेली* समाजाचे *संत जगनाडे महाराज* (८/१२/१६२४ - १६८८) ह्या सर्व संत महाराज ह्यांना ब्राह्मण मराठी साहित्यिकांनी पुर्ण दुर्लक्षित केले आहे. *संत तुकाराम महाराज* ह्यांचे तर ब्राह्मणी व्यवस्थेने *"वैकुंठ गमन"* दाखविले आहे. परंतु ब्राह्मण धर्मीय *संत रामदास स्वामी* ह्यांचा उदोउदो झालेला दिसुन येतो. परंतु संत रामदास स्वामी ह्यांना वरिष्ठ तसेच त्यांच्याच परिवारातील *संत एकनाथ महाराज* ह्यांना दुर्लक्षित केले गेले. हे कारण समजुन घ्यावे लागणार आहे. ही सर्व संत मंडळी *"पंढरपुरी विठोबा अर्थात बुद्ध"* ह्यांच्या चरणी लीन झालेली आहेत. *संत तुकाराम महाराज* हे नांदुरकी ह्या वृक्षाखाली ध्यानस्थ असतांना, *छत्रपती शिवाजी महाराज* हे संत तुकाराम महाराज ह्यांचे आशीर्वाद घेवुन राज्यकारभार चालविण्यास शुरुवात करतात. *शिवाजी महाराज* हे तुकाराम महाराज ह्यांना आपले गुरू मानतात. परंतु ब्राह्मणी व्यवस्थेने *संत रामदास स्वामी* ह्यांना शिवाजी महाराज ह्यांचे *"गुरु"* असल्याचा खोटा प्रचार केला. जेव्हा की *शिवाजी महाराज - संत रामदास स्वामी* ह्यांची भेट कधी झालीच नाही. *पंढरपुरी विठोबा अर्थात बुद्ध* ह्यांच्यावर अभंग रचणा-या *सर्व संतांच्या अभंगावर* आपण पुन्हा कधी तरी चर्चा करु या !

            *"भाषा साहित्य बोध"* होण्याकरिता *"लिपी"* असणे गरजेचे आहे. अत: *"लिपीचा उगम"* समजुन घ्यावा लागणार आहे. तेव्हा आपल्याला प्राचिन *"सिंधु - हडप्पा सभ्यता"* ही ओळख आवश्यक आहे. *पुर्व हडप्पा सभ्यता* कालखंड - इ. पु. ७५०० - ३३०० / *हडप्पा सभ्यता* वा पहिले नागरिकीकरण कालखंड - इ. पु. ३३०० - १५०० / *परिपक्व हडप्पा सभ्यता* - इ. पु. २६०० - १९०० असा कालखंड आहे. तसेच प्राचिन *"तिन युग"* कालखंड सुध्दा समजणे आवश्यक आहे. *पाषाण युग* -  ह्याचे तिन कालखंड आहेत. *पुर्व पाषाण युग* कालखंड - इ. पु. २५००० - १२००० / *मध्य पाषाण युग* कालखंड - इ. पु. १२००० - १०००० / *नव पाषाण युग* कालखंड - १०००० - ३५०० / *कांस्य युग* कालखंड - इ. पु. ३३०० - १२०० / *लौह युग* कालखंड - इ. पु. १२०० - ५५० असा आहे. ह्याशिवाय मध्य प्रदेशच्या *नर्मदा* नदी किनारी *हथनोरा* गावांमध्ये *"५ लाख वर्षांपूर्वीच्या"* मानवाचा शोध भुवैज्ञानिक *अरुण सोनकिया* ह्यांनी सन १९९७ साली लावलेला आहे. सदर मानव हा *"होमो इरेक्टस"* श्रेणीतील आहे. *"नर्मदा मानव"* हे नाव त्याला दिले गेले. *दक्षिण आफ्रिका* ह्या देशातुन  सर्व प्राचिन मानवाचे स्थलांतरण हे मानले जाते. सदर प्राचिन मानवाच्या इतिहासावर पुन्हा कधी तरी चर्चा करु या. *"सिंधु सभ्यता"* ही इ. पु. ३३००  असुन येथिल उत्खननात सापडलेल्या *"लिपी चे वाचन"* अद्यापही शक्य झालेले नाही.  *"सिंधु घाटी सभ्यता"* ही प्रगत नगरीय सभ्यता असल्याचे प्रमाण दिसुन येतात. सदर ठिकाणच्या *धोलविरा* भागात  *"सहा आरे असलेला एक चक्राकार स्तुप"* सापडलेला आहे. अगदी तसाच स्तुप पंजाबच्या *संगोल* येथे आढळुन आला. सिंधु घाटी उत्खननात *"बसलेला सिंह"* दिसुन आला. अगदी तसाच सिंह *सम्राट अशोक* ह्यांच्या शासन कालात दिसुन येतो. सिंधु घाटी उत्खननात एक *"बैल"* आढळुन आला. अगदी तसाच *बैल* हा आंधं प्रदेशच्या *अमरावती"* येथील उत्खननात सापडलेला आहे. मोहंजोदाडो येथे एक *"स्तुप आणि तरणताल"* हा आढळून आला. अगदी तसाच स्तुप आणि तरणताल हा *"वैशाली"* येथे दिसुन आला आहे. सिंधु घाटी उत्खननात *"ध्यानस्थ राजा"* ची मुद्रा / पहनावा आढळुन आला. *तथागत बुद्धाची* ध्यानस्थ मुद्रा / पहनावा अगदी तसाच आहे. सिंधु घाटी उत्खननात एक *"स्वस्तिक"* चिन्ह दिसुन आले. शाक्यमुनी बुध्द काळात अगदी तसेच स्वस्तिक दिसुन आले. अर्थात *सिंधु घाटी सभ्यता"* ही पहिले बुद्ध - *ताम्हणकर बुध्द* असल्याचा बोध करुन जातो. तर *शाक्यमुनी बुध्द* हे २८ वे बुध्द असुन ती परंपरा अव्याहतपणे सुरु असल्याचे प्रमाण सांगुन जातात. *शाक्यमुनी बुध्द* कालखंडात *"ब्राम्ही लिपी - धम्म लिपी"* असल्याचे स-प्रमाण *चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेख* बोलुन जातो. सदर *"सिंधु घाटी सभ्यता"* उत्खननात कुठेही *"वैदिक ब्राह्मण"* पुरावा आढळुन आलेला नाही.

            .*"सिंधु घाटी सभ्यता"* ह्या संदर्भात अल्प इतिहास सांगण्याचे प्रयोजन असे की, *"रामायण / महाभारत"* ही दोन महाकाव्ये वा *"ऋग्वेद / उपनिषद"* ही ग्रंथ ही *"संस्कृत"* भाषेतील असुन ग्रंथ लिपी ही *"देवनागरी "* आहे. *"देवनागरी लिपी"* संदर्भात पुढे चर्चा होणारंचं आहे. सिंधु घाटी सभ्यता *"लिपी"* ही अजुनही वाचणे हे शक्य झालेले नाही. नंतर बुध्द काळात (इ. पु. ५ वी शती) *"धम्म लिपी - ब्राम्ही लिपी"* ही अस्तित्वात होती. *"चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेख हे ब्राम्ही लिपीमध्ये"* आहेत. इंग्रज काळात *"ब्राम्ही लिपी"* ही समजण्यात सुरुवात झाली. बुध्द काळात *"पाली प्राकृत"* ही बोली भाषा होती. अर्थात *"मागधी ही बोली भाषा"* होती. *पाली प्राकृत* भाषेत *१० स्वर* / *संस्कृत* भाषेत *१३ स्वर* / *अपभ्रंश* भाषेत *८ स्वर* / *हिंदी* भाषेत *११ स्वर* आहेत. पाली भाषेत *ऋ, ऐ, औ, श, ष* ह्या संस्कृत भाषेतील शब्दांचा प्रयोग नाही. पाली भाषेत *"विसर्ग"* नाही. *पाली प्राकृत* भाषेत पुढे संस्कार करण्यात आले. त्या भाषेला *"हायब्रीड संस्कृत"* (इ.पु. ३ - २ शती) म्हटल्या गेले. अर्थात पाली भाषेची संस्कार अवस्थाचं ही *"संस्कृत भाषा"* आहे. आजची संस्कृत भाषा ही *"क्लासिकल संस्कृत "* भाषा आहे. *"हायब्रीड संस्कृत"* भाषानंतर *"अपभ्रंश भाषा"* (इसवी पहली शती) हिचा उगम झाला. आणि १४ व्या शतकात अपभ्रंश भाषेला उतरती आली. *सिध्द सरहपाद* (७६९) हे अपभ्रंश भाषा साहित्यातील पहिले कवि तर *रइथु* हे (१४०० -१४७९) शेवटचे कवि राहीले आहेत. *कालीदास* ह्यांच्या *"विक्रमोर्वशीयम्"* ह्या ग्रंथामध्ये अपभ्रंश भाषेचा प्रभाव दिसुन येतो. अर्थात *"पाली भाषा"* ही भारतातील *"सर्व भाषांचीच जननी"* आहे. त्यानंतर *"आदी हिंदी"* (१२ वी शती) ह्या भाषेचा आविष्कार झाला. *"आदि हिंदी"* भाषेचे पहिले कवि *अब्दुल रहमान* (अद्दहमान - १२ वी शती) आहेत. आणि सन १६४५ नंतर *"उर्दु भाषेचा"* आविष्कार झाला. आणि तदनंतर *"आधुनिक हिंदी"* ही भाषा जन्माला आली. सन १ में १९५० रोजी *"हिंदी राजभाषा हिंदी साहित्य संमेलन"* हिची स्थापना झाली.

         प्राचिन भारतातील *सिंधु घाटी सभ्यता लिपी* ही सर्वात प्राचिन अशी लिपी आहे. तिला अद्यापही समजुन घेता आले नाही. त्यानंतरच्या बुध्द कालखंडामध्ये  - *"ब्राम्ही लिपी - धम्म लिपी"* ही उदयास आली. त्यानंतर भारतामध्ये *खरोष्टी लिपी"* हि सुद्धा दिसुन येते. चक्रवर्ती सम्राट अशोकाचे *"शाहबाजगडी / मानसेहरा शिलालेख"* (पाकिस्तान) हे खरोष्टी लिपीमध्ये लिहिलेली आहेत. ही लिपी आणि ब्राम्ही लिपी वाचण्याचे श्रेय एसियाटीक सोसायटी ऑफ बंगालचे *जेम्स प्रिंसेप* (१७९९ - १८४०) ह्यांना जाते. *कुटील लिपी / देवनागरी लिपी / शारदा लिपी / गुरुमुखी लिपी / ग्रंथ लिपी / कन्नड आणि तेलुगू लिपी / तामिल आणि मलयालम लिपी / शाहमुखी लिपी / मोडी लिपी"* ह्या लिपी तदनंतर जन्माला आल्यात. ह्या सर्व लिपी संदर्भात नंतर पुढे कधी तरी चर्चा करु या ! परंतु *"देवनागरी लिपी "* विषयी चर्चा करणे गरजेचे आहे. ही लिपी *"नागवंशीय लोकांची"* लिपी आहे. *भीमा कोरेगाव स्तंभ"* ह्यावर २० नावे ही *"नाग / नाक"* लोकांची दिसून येतात. *"नाग + री"* > नाग लिपी आणि *"री"* हा शब्द संबंधकारक आहे. *"मराठी भाषा कालखंड हा इसवी सन १००० - १३००"* मानला जातो. कन्नड / तेलगु भाषा ही मराठी भाषेपेक्षा ५०० वर्षे जुनी आहे. *दुर्गा भागवत* ह्यांनी राजाराम शास्त्री भागवत ह्यांच्या संशोधन (?) आधारे *"जुनी महाराष्ट्री"* भाषा ही संस्कृत पेक्षा जुनी (२५०० वर्षापुर्वीची) मानलेली आहे. अर्थात कन्नड / तेलगु पेक्षाही जुनी भाषा मानलेली आहे. *विश्वनाथ खरे* ह्यांनी *"संमत सिध्दांत"* आधारे मराठीचे मुळ हे तामिळ भाषेमध्ये शोधलेले आहे. *डॉ श्री. ल. कर्वे* ह्यांचे ही तसेच मत दिसुन येते. *हरी नरके* ह्यांनी इसवी सनाच्या पुर्वीपासून असलेली भाषा *"अहिर माहाराष्ट्री - प्राचिन म-हाठी"* हिच्या पासुन *"शौरसेनी भाषा"* निघाली आहे. कालांतराने *"मागधी / पैशाची"* या दोन भाषा निघाल्यात. अर्थात ती मराठीचे नातवंडे आहेत, असा अफलातून *"जावई शोध"* लावला. खरे तर *"मागधी भाषेच्या खुना"* ह्या मराठी भाषेत दिसुन येतात. मराठी भाषेचे *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / व-हाडी मराठी / कोल्हापूरी मराठी"* असे पोट प्रकार आहेत. *राजे शिवछत्रपती महाराज* ह्यांच्या काळात *"मराठीवर फारसी भाषेचा प्रभाव"* हा दिसुन येतो. राजकीय पत्रव्यवहार / बखरी लिहिण्यासाठी *"मराठी भाषेचा व्यवहार"* होत असल्याचे बोलले जाते. परंतु शिवकालीन शिलालेख हे *"संस्कृत भाषेत कां लिहिलेली गेलीत ?"* हा प्रश्न उपस्थित होतो. परंतु हे सत्य असे आहे की, *"पाली भाषा अपभ्रंशामधुन पुढे मराठी भाषेचा जन्म झाला."* भारत सरकारने *"देवनागरी लिपी"* हिला आपली *"अधिकृत लिपी"* म्हणून मान्यता दिलेली आहे. देवनागरी लिपी हिचे *"प्रथम स्वरुप इसवी ११००"* मध्ये दिसुन येते. तर *"इसवी १७९६"* मध्ये ह्या देवनागरी लिपीच्या प्रयोगाला प्रारंभ झाला.

         *"पाली - प्राकृत भाषेला"* अभिजात दर्जा देण्यास *केंद्र शासनाची राहिलेली उदासिनता* (विलंब ?) ही शर्मसार करणारी आहे. *"इ.पु. पाचवी शती - इसवी ३५०"* हा मोठा कालखंड *"ब्राम्ही लिपीचा"* प्रयोग काळ राहिलेला आहे. *चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य* ह्यांचा कालखंड हा इ. पु. २६८ - २३२ तर *"सर्व मौर्य साम्राज्य कालखंड "* हा इ. पु. ३२२ - १८५ असा मोठा राहिलेला आहे. सम्राट अशोक ह्यांचे अधिकतर शिलालेख हे *"ब्राम्ही लिपीमध्ये"* आहेत. काही शिलालेख हे *"खरोष्टी लिपीत"* आहेत. तर *"सारनाथ शिलालेख/ ज्ञानदेव शिलालेख / गुजरात मधील काही शिलालेख"* ह्यामध्ये संस्कृतचा (हायब्रीड संस्कृत) प्रभाव हा दिसून येतो. आजची संस्कृत भाषा ही *"क्लासिकल संस्कृत"* भाषा आहे. तेव्हा प्राचिन बोलीभाषा ही *"पाली प्राकृत - मागधी"* भाषा होती. *पाली व्याकरण* हे *बलदेव उपाध्याय* ह्यांनी तिन भागात वर्गीकृत केले आहे. *"कच्चायन व्याकरण / मोग्गलायन व्याकरण / अग्गवंसस्कृत सद्दनीति."* कच्चायन व्याकरण ह्यामध्ये ४३ ध्वनीचा संदर्भ दिसून येतो. मानवी जीवनाची व्यापक आणि खोलवर अनुभुती ही *"त्रिपिटक ग्रंथात"* दिसुन येते. पाली भाषेतील दोन प्रकारचे काव्य - *वर्णनात्मक काव्य / आख्यायनात्मक काव्य.* पाली भाषा उगम आणि भावार्थ संदर्भात विद्वानामध्ये काही मतभेद ही आहेत. जर्मन विद्वान *मॅक्स बैसलर* ह्यांच्या मते - पाली शब्दाचा उगम *"पाटलीपुत्र"* ह्या शब्दातुन (पाटलीपुत्र > पाटली > पाली) झालेला आहे. दुसरे विद्वान *प. विधुशेखर भट्टाचार्य* ह्यांच्या मते - पाली शब्दांची उत्पत्ती *"पंक्ती"* ह्या शब्दातुन झाली आहे. मराठीचा शब्द *"पाळी"* आणि संस्कृत शब्द *"पालन"* हे शब्द निगडित आहेत. *आचार्य बुध्दघोष* ह्यांनी हा उत्पत्ती संदर्भ नाकारला आहे. *भिक्खु जगदीश* ह्यांच्या मते - *"पालि > परिणाम"* शब्दापासून उत्पत्ती मानलेली आहे. *सिंहली परंपरा* नुसार *"मागधी > मगध"* भाषा पासुन उत्पत्ती मानलेली आहे. *प्रा. आर. डेव्हिस* ह्यांच्या मते - इ. पु. सहाव्या वा सातव्या शतकातील *"कोसल प्रदेश"* ची भाषा मानलेली आहे. *वेस्टर गार्ड* ह्यांनी *"उज्जैनी प्रदेशाची"* बोली भाषा म्हटलेले आहे. *अभिधानप्पदिपिका* नुसार पाली भाषा उत्पत्ती - *"पालेति रक्खतीति पालि."* चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांच्या शिलालेखात (भाब्रु) - *"धम्म पलिपाय"* हे वर्णन दिसुन येते. अर्थात *"बुद्धाचे वचन."* *"पलिपाय शरण"* शब्दातुन पाली शब्दांची उत्पत्ती झालेली आहे. *आचार्य बुध्दघोष* लिखित *'विशुध्दीमग्ग / महावंश"* ह्या ग्रंथामध्ये *"मागधी"* शब्दाला मुळ भाषा मानलेले आहे. इसा पुर्व १४ व्या  शतकातील *बुध्दघोष* ह्यांच्या *अट्टकथा* ह्या बौध्द ग्रंथामध्ये पालीचा उल्लेख दिसुन येतो. *"दिपवंश"* हा ग्रंथ सर्वात प्राचिन ग्रंथ समजला जातो. त्या ग्रंथामध्ये पाली शब्दाचा अर्थ - *"बुध्दाचे वचन"* असे दिलेले आहे. *आचार्य बुध्दघोष* ह्यांच्या काळात चार बौध्द रचनाकार झालेले आहेत. *बोधिसत्व अश्वघोष / आचार्य नागार्जुन / आचार्य वसुबंधु / आचार्य दिगनाग.* ह्या रचनाकारांच्या साहित्यात *"अपभ्रंश भाषा"* दिसुन येत नाही. परंतु *कालीदास* ह्यांच्या साहित्यात *"अपभ्रंश भाषा"* प्रभाव दिसून येतो. तसेच *कालिदास* ह्यांच्या साहित्यात *"भोगवाद"* दिसुन येतो. *भदंत अश्वघोष* ह्यांच्या साहित्यामध्ये *"सौंदर्यशास्त्र / मानवशास्त्र / नैतिकवाद / दर्शनशास्त्र / प्रेमभाव"* अनुभुती ची जाणिव होते. भदंत अश्वघोष ह्यांचे *"सौदरांनद / बुध्द चरित्र"* ही प्रसिध्द ग्रंथ आहेत. पुरातत्व विद्वान *लार्ड कनिंगहम* ह्यांच्या नंतर *ओव्हरटेल* ह्यांनी उत्खनन करण्यात मोलाची कामगिरी केली. *"भारताची राजमुद्रा"* बनण्यास त्या विद्वानांचे फार मोठे योगदान आहे. भारतातील *"भाषा साहित्य निर्मिती"* मध्ये प्राचिन बौध्द साहित्य हे मैलाचा दगड आहे. अगदी *"मराठी साहित्यात सुध्दा !"* 


*****************************

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

नागपूर, दिनांक ५ आक्टोंबर २०२४

No comments:

Post a Comment